जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, या मोदी सरकारच्या ‘काश्मीर धोरणा’वर लोकसभेने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. दरम्यान या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या या निर्णयावर चर्चा झाली असून पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे नेते शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानने तिखट प्रतिक्रिया दिली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

Article 370: आणखी एक पुलवामा घडेल – इम्रान खान

Article 370: अस्वस्थ पाकिस्तानची OIC मध्ये धाव, काश्मीर प्रश्नावर सौदी अरेबियात होणार चर्चा

यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शरीफ यांना विरोधी नेत्यांची नेमकी काय अपेक्षा आहे ? मी पाकिस्तान लष्कराला भारतावर हल्ला देण्याचा आदेश दिला पाहिजे का ? अशी विचारणा केली. मोदी सरकारने काश्मीरसंबंधी घेतलेल्या निर्णयानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयासहित लष्कराचे अधिकारी भारताविरोधीत वक्तव्यं करत आहेत. अनेक खासदारांनी भारताला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे. तसंच युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी तयार राहिलं पाहिजे असंही म्हटलं आहे.

इम्रान खान यांची भारताला पोकळ धमकी
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यामुळे पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट सुरु आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता असा दावा सुद्धा इम्रान यांनी यावेळी केला. हे प्रकरण आपण संयुक्त राष्ट्राकडे घेऊन जाऊ असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी लष्कराची बैठक
पाकिस्तानी लष्कराच्या अधिकृत ट्विटरवरुनही कलम ३७० हटवण्यावरुन ट्विट करण्यात आले. यामध्ये काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर बैठक घेण्यात आल्याची माहिती दिली. लष्कर पाकिस्तान सरकारसोबत आहे. पाकिस्तानचं लष्कर भारताचा हा निर्णय़ स्वीकारण्यास नकार देतं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.