नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नितीशकुमार यांच्यासोबत भाजपाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजकारणात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात होती.

तसोच जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवालाल चौधरी यांनी तर हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

काल नितीश कुमार यांनी एक महत्वाचा खुलासा केला होता. ते म्हणाले होते, “आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, भाजपामधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे”. नितीश कुमार यांच्या या विधानामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.