जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८ जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.