भारतात रोजगार निर्मितीसंबंधी एक चांगली बातमी आहे. मार्च महिन्यात विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्मितीचे प्रमाण वाढले असून रोजगार निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

निक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच निर्देशांक ४७.८ टक्क्यांवर होता. निर्देशांक ५० च्या पुढे असणे हा अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे लक्षण आहे. फेब्रुवारीमध्ये निर्देशांकात झालेली घट ही क्षणिक ठरली आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे असे अर्थतज्ञ आशना दोधिया यांनी सांगितले.

हा सर्वेक्षण अहवाल राजकीय आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलासा देणारी बाब आहे. कारण काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष रोजगाच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. मोदींच्या राजवटीत बेरोजगारी वाढल्याचा त्यांचा आरोप आहे. निक्की इंडियाच्या मार्चच्या अहवालानुसार सेवा आणि उत्पादन या दोन्ही प्रमुख क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

मागणी वाढल्यामुळे सध्या जे स्त्रोत आहेत, व्यवस्था आहे त्यावर दबाव येत आहे. त्यामुळे सर्वा पुरवठादरांनी मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी संख्येमध्ये वेगाने वाढ केली आहे. जून २०११ नंतर ही आशादायक स्थिती आहे.