कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने त्रिशंकू कौल दिला आहे. १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. दशकभरात दुसऱ्यांदा भाजपा सत्ता स्थापनेच्याजवळ येऊन पोहोचला आहे. २००८ साली सरकार बनवण्यासाठी भाजपाला तीन आमदार कमी पडले होते. यावेळी आठ आमदारांची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार यंदाच्या निवडणुकीत १२ जागांवर भाजपा उमेदवारांचा फक्त काहीशे मतांच्या फरकाने पराभव झाला.

आपल्याला मस्कीचे उदहारण घेता येईल. काँग्रेसचे प्रताप गौडा यांनी फक्त २१३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. बदामीमध्ये भाजपा उमेदवार बी. श्रीरामलु यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले. गडगमध्ये भाजपाच्या अनिल मेनसिनाकाय यांचा काँग्रेसच्या एच.के.पाटील यांनी १८६८ मतांनी पराभव केला. हायरीकीरुरमध्ये बासावानगौडा पाटील यांनी भाजपाच्या उजनेश्वरा बानाकार यांच्यावर ५५५ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

जामकाडी, येनकीमार्डी, मस्की, श्रीनगीरी, कुंडगोल, येल्लापूर, आथानी, बेल्लारी, विजयनगर या मतदार संघात भाजपा उमेदवार अत्यंत थोडक्या मतांच्या फरकाने पराभूत झाले. या जागा भाजपाने जिंकल्या असत्या तर आज चित्र वेगळेच असते. भाजपाला सत्ता स्थापनेसाठी इतका संघर्ष करावा लागला नसता.

येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यांना आता येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करायचे आहे.

सकाळी नऊ वाजता राजभवनाच्या लॉनवरील ग्लास हाऊसमध्ये कडेकोट बंदोबस्तात त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे.पी. नड्डा आणि भाजपाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी सकाळी विविध मंदिरांमध्ये जाऊन देव दर्शन घेतले.