पश्चिम बंगालमध्ये २०१५ च्या कार्यक्रमामध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना देवाशीष आचार्य या युवकाने कानशिलात लगावली होती. त्या युवकाचा रहस्यमय रित्या मृत्यू झाला आहे. काही अज्ञात लोकांनी देवाशीषला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला. देवाशीषच्या कुटुंबाने त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

गुरुवारी देवाशीष आचार्यला गंभीर स्वरूपात मिदनापुरातील तमलुक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या रेकॉर्डवरून कळले की, देवाशीषला सकाळी ४ वाजून १० मिनिटांनी काही अज्ञात लोकांनी रुग्णालयात आणले होते. त्यानंतर काही वेळेत त्याचा मृत्यू झाला. जेव्हा देवाशीषचे कुटुंब रुग्णालयात पोहचले तेव्हा त्यांना रहस्यमय मृत्यूबाबत माहित झाले. त्यांनी देवाशीषची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा- पैशांसाठी पोटच्या पोराची विक्री; सहा दिवसाच्या बाळाला पालकांनीच ३ लाखांना विकलं

दरम्यान, भाजपा नेत्यांनी देवाशीषच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत. देवाशीषने २०२० मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात देवाशीष १६ जूनला दोन मित्रांसोबत मोटर सायकलने बाहेर गेला होता. यावेळी सोनापेट्या टोल प्लाझाजवळ एका चहाच्या दुकानावर ते थांबले. त्यानंतर तो अचानक निघून गेला. त्याने चहाचा स्टॉल सोडल्यानंतर काय झाले? याचा तपास पोलीस करीत आहेत.