सुरक्षा दलाने खात्मा केलेल्या दहशतवादी मन्नान वाणीविषयी मेहबूबा मुफ्ती यांना साक्षात्कार झाला आहे. वाणी काश्मीर हिंसाचारातील पीडित असल्याचे तारे त्यांनी तोडले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तसेच अलीगढ मुस्लीम विद्यापीठात देशद्रोहाच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपला पक्ष उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएचडी केलेल्या मन्नान वानी दहशतवादी संघटना हिजबुल मजाहिद्दीनमध्ये दाखल झाला होता. सुरक्षा दलाने ११ ऑक्टोबरला झालेल्या एका चकमकीत त्याचा खात्मा केला. त्यानंतर AMUत शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी वानीच्या मृत्यूसंदर्भात शोकसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, यावेळी देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप आहे. देशविरोधी घोषणाबाजीच्या आरोपाखाली ७ काश्मीरी विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेल्या देशद्रोहाचे आरोप मागे घेण्यात यावे, अन्यथा विद्यापीठ सोडून निघून जाऊ अशी धमकी AMUत शिकणाऱ्या १२०० विद्यार्थ्यांनी दिली आहे.

१२०० काश्मिरी विद्यार्थ्यांनी AMU सोडून जाण्याचा पवित्रा घेणे ही गंभीर बाब असून AMUचे कुलगुरु, शिक्षण, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा मुद्दा सोडवायला हवा, अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

आता या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्ष मैदानात उतरला आहे. या विद्यार्थ्यांवर दबाव टाकल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा मुफ्ती यांनी दिला आहे. केंद्रा सरकारने या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि एएमयू प्रशासनाने विद्यार्थ्यांवरील कारवाई रद्द करावी अशी मागणी पक्षाने केली आहे. राज्य सरकारने संवेदनशीलतेने प्रकरण हाताळण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. कश्मीरमधील अमानूष हिंसाचाराचा बळी ठरलेल्या विद्यापीठातील आपल्या माजी सहकाऱ्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला तर त्यात अयोग्य काय असा सवाल पीडीपीने केला आहे. एएमयूमधील कश्मीरी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ कश्मीर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी मूकमोर्चा काढला होता. आता वादात पीडीपीने उडी घेतल्याने या वादाला राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे.

मन्नान वानी ठार झाल्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे १५ विद्यार्थी विद्यापीठाच्या केनेडी हॉलमध्ये एकत्र आले. त्यावेळी त्यांनी मन्नान वानीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांनी शिस्त मोडली. तसेच विद्यापीठाचे नियमही मोडले. त्यांनी नियमांचा भंग करत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यासाठी सभा बोलावली. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रोफेसर मोहसिन खान यांनी सांगितले.