“लूट जाऊंगा, मिट जाऊंगा, बरबाद हो जाऊंगा….गांववालो” हे वाचताना मोठ्या पाण्याच्या टाकीवर चढलेला शोले चित्रपटामधला विरू आपल्याला आठवला असेलच. बसंतीशी लग्न करण्यासाठी उत्सुक अणि त्यासाठी काहीही करायला तयार असलेला विरू आपल्याला खऱ्या आयुष्यात पण दिसतो. कधी बिल्डिंगच्या छतावर तर कधी उंच झाडावर, यावेळी तर अशाच एका तरूणाने वीजेचा खांब निवडला कारण कुटुंबातील लोक त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार नव्हते. मुख्य म्हणजे तुम्हाला वाचून गंमत वाटेल कारण या तरूणाचे वय होते फक्त ६० वर्षे.

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात एक ६० वर्षीय चिरतरूण वृध्द विद्युत खांबावर चढले. कारण त्यांची मुलं त्यांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध करत होती. पाच मुले आणि अनेक नातवंडे असलेल्या सोब्रन सिंग यांना आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध लग्न करायचे होते.

मुलांनी आपलं दुसर्‍या लग्न करून द्यावं यासाठी ते विजेच्या खांबावर चढले. रविवारी धौलपूरपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या माधा भाऊ गावात ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सिंग जेव्हा खांबावर चढले तेव्हा त्यांची मुले व नातवंडे काळजीत पडली आणि त्यांनी शेजाऱ्यांना मदतीला बोलावले. विजेच्या खांबाजवळ मोठी गर्दी जमली आणि सिंग यांना खाली उतरण्यावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिला.
सिंग यांनी उच्च विद्युतदाब असलेली वायरही हातात धरली आणि आपल्या मुलांनी लग्न करण्यास परवानगी न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. सुदैवाने या वायरमध्ये वीज चालू नव्हती.

सिंग यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक उपकेंद्रांना घटनेची माहिती दिली त्यानंतर विद्युत विभागाने परिसरातील वीज तोडली. तब्बल एक तासानंतर स्थानिक तरुणांनी खांबावर चढून या वयोवृद्ध व्यक्तीला खाली उतरवले.

कोणाशी लग्न करायचे आहे असे जेव्हा जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, “कोणाशीही चालेल. मला फक्त एक साथीदार हवा आहे.” सिंग यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आणि ते आपल्या तीन मुलांसमवेत राहतात.