भाजपच्या प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेत्या उमाभारती यांनी अत्यंत उच्चरवात काँग्रेसवर टीकेचे आसूड ओढताना राहुल गांधी अपयशी ठरल्याने प्रियांका गांधी यांना प्रचारात उतरवण्याची नामुष्की त्या पक्षावर आल्याचे सांगितले. काँग्रेसने निवडणुकीचे रणांगण गमावले असताना ते वाचवण्यासाठी राहुलच्या अपयशानंतर त्यांनी प्रियांकाला प्रचारात उतरवले, असे ते म्हणाले.
श्रीमती भारती यांची याच महिन्यात नरेंद्र मोदी हे विनाशाचे हस्तक आहेत, अशी टीका करणारी ध्वनिफीत काँग्रेसने जाहीर केली होती.
राहुल गांधी अपयशी ठरले व आता काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पुढे केले. प्रियांका यांची वक्तव्ये राजकीय हेतूने प्रेरित होती. याचा अर्थ राहुल अपयशी ठरल्याचे ते संकेत होते, असे सांगून त्या म्हणाल्या की, म्हणून त्यांनी प्रियांकाच्या रूपाने आणखी एक गांधी बाहेर आणला. प्रियांका यांनी वड्रा यांच्यावर भाजपने टीका करताच भाजपला घबराट पसरलेले उंदीर म्हटले होते. प्रियांका काहीही बोलत आहे व त्याला उत्तर देणे आमचे काम आहे.
त्यांच्या स्वत:विषयीच्या काँग्रेसने जारी केलेल्या व्हिडीओफितीबाबत उमाभारती म्हणाल्या की, ते प्रकरण अकारण मोठे केले गेले, त्यातून काँग्रेसला राजकीय फायदा हवा होता.
भाजपने या आठवडय़ात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या जमीन व्यवहारांविषयी सीडी जाहीर केली आहे.
झाशी शहर हे आयटी शहर म्हणून नावारूपास आणू, असे सांगून उमाभारती म्हणाल्या की, दहा वर्षांपूर्वी आम्ही नारायणमूर्ती यांना मध्यप्रदेशात आयटी केंद्र उभे करण्यासाठी पाचारण केले. आता येथेही आम्ही त्यांना मोठी कंपनी सुरू करण्यास सांगू. झाशी कॉरिडॉरचा मार्ग आयटी केंद्रासाठी योग्य आहे कारण तो भाग रेल्वे व विमान सेवेने जोडलेला आहे. झाशीतील वाईट स्थितीला बसपा, सपा जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला.