वीस दिवसांपूर्वी एका ३५ वर्षीय व्यक्तीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. पण हा मृत्यू वीजेच शॉक लागून नव्हे तर सुनियोजित पद्धतीने ही घडवून आणलेली हत्या असल्याचे आता समोर आले आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

हत्येमागे पत्नीचा हात
मानाराम असे मृताचे नाव असून बारमेर जिल्ह्यातील दीनागड भागामध्ये राहतो. मानारामच्या मृत्यूमागे त्याच्या पत्नीचा हात आहे. सुरुवातीला पप्पू देवीने (३०) मानारामचा मृत्यू वीजेचा शॉक लागून झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण पतीच्या निधनानंतर १२ दिवसांनी त्याच्या कुटुंबीयांनी पप्पू देवीवर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

का केली हत्या ?
पप्पू देवीचे दुसऱ्या एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते. मानारामला पप्पू देवीच्या या अनैतिक संबंधांबद्दल समजले होते. पती अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने तिने त्याची हत्या केली. मृत मानारामच्या भावाने पप्पू देवी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

कशी केली हत्या ?
१५ जूनला पप्पू देवीने तोगारामला फोन केला व मानाराम काहीच बोलत नसल्याचे सांगितले. कुटुंबीय मानारामच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याच्या पायातून रक्त येत होते. पप्पू देवीने मानारामला वीजेचा शॉक लागल्यामुळे त्याच्या पायातून रक्त येत असल्याचे सांगितले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांनी मानारामच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर १२ दिवसांनी मानारामच्या वडिलांनी आणि अन्य कुटुंबीयांनी पप्पू देवीवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपले बाहेर प्रेमप्रकरण होतो व मानारामला याबद्दल कळले होते असे तिने सांगितले.

पप्पू देवी आणि तिच्या प्रियकराने सुनियोजित पद्धतीने हत्या केली. त्यांनी मानारामला आधी झोपेच्या गोळया दिल्या. त्यानंतर वीज प्रवाह सुरु असलेली वायर त्याच्या हातात दिली. त्याचा शॉक लागून मानारामचा मृत्यू झाला. पप्पू देवीच्या प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.