"अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही," असं सांगत भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरून मोदींवर निशाणा साधला. विशेष म्हणजे स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना यांचं श्रेय दिलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. आता काम सुरू झालेलं असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. टीव्ही ९भारतवर्ष वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी धक्कादायक विधान केलं आहे. "पंतप्रधानांचं यामध्ये कोणतंही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळे म्हणू शकतो की, निर्णय आला. मूळात ज्यांनी यात काम केलं आहे, त्यांचं मी नावं घेतलं आहे. यात पहिलं नावं राजीव गांधी यांचं आहे," असं स्वामी म्हणाले आहेत. Girgit Swamy Saying PM Modi had no Role in building Ram Mandir and he is giving Credit to Rajiv Gandhi for it pic.twitter.com/AYD2fNk7Aq — Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) September 28, 2020 भाजपाचे आमदार तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही मुलाखत कधीची आहे, याबाबतचा उल्लेख बग्गा यांनी केलेला नाही. मात्र, या मुलाखतीवरून बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या टीका केली आहे. "गिरगिट (रंग बदलणारा सरडा) स्वामी म्हणत आहे की, पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिर उभारणीमध्ये कोणतंही योगदान नाही आणि राजीव गांधींना यांचं श्रेय देत आहे," अशी टीका बग्गा यांनी केली आहे.