एका तीस वर्षीय इंजिनिअर तरुणाचे अपहरण करुन त्याचे बंदुकीचा धाक दाखवून एका मुलीशी जबरदस्तीने लग्न लाऊन दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिहारमध्ये ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, समस्तिपूर येथील दुर्गा सरन नामक एक तरुण शनिवारी वैशाली जिल्ह्यातील सलाहा येथून बिदापूर येथे आपल्या गावी मित्र सौरव याच्यासोबत दुचाकीवरून निघाला होता. दरम्यान, त्याच्यामागून कारमध्ये आलेल्या अपहरणकर्त्यांनी सरन याला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. ही बाब सौरवने सरनची आई वीनादेवी यांनी सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेत आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, पोलिसांनी अपहरण झालेल्या इंजिनिअर तरुणाची कामेश्वर सिंह नामक व्यक्तीच्या घरातून रविवारी सकाळी सुखरुप सुटका केली. त्यानंतर सरनने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यातून धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, त्याला २२ वर्षीय तरुणीशी जबरदस्तीने विवाह करण्यास पार पाडले. त्यानुसार, मुलीच्या कुटुंबातील ६ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मुलीने असा दावा केला आहे की, सरनसोबत तिचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. सरनने मुलीला लग्न करण्यासाठी हुंड्याची मागणी करीत तिला टाळण्याचा प्रयत्नही करीत होता. त्यामुळेच तिच्या कुटुंबियांनी सरनचे अपहरण केले होते.