रेल्वेची कोणतीही भाढेवाढ नाही

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ६४ हजार ५८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, एकूण भांडवली खर्च १.५८ लाख कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच निवडणूक विचारात घेता कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही.  आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे. रेल्वे प्रवाशांसाठी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही देशात विकसित केलेली पहिली जलदगती गाडी सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. ही जागतिक दर्जाची असेल, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या पुनर्रचनेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. २०१८-२०१९ हे वर्ष रेल्वेसाठी सर्वात सुरक्षित ठरले असून देशभरात आता ब्रॉडगेज मार्गावर एकही मानवरहित रेल्वे फाटक उरले नाही, असा दावा गोयल यांनी केला.

नवे रेल्वेमार्ग निर्माण करण्यासाठी ७,२५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेज परिवर्तनासाठी २,२०० कोटी, दुहेरी रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी ७०० कोटी,  रोलिंग स्टॉकसाठी ६,११४ कोटी, सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणांसाठी १,७५० कोटी,  प्रवासी सुविधांसाठी ३४२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी रेल्वेचा महसूल २ लाख ४९ हजार ८५१ कोटी रुपये महसूल अपेक्षित होता. या वर्षी त्यात विक्रमी २२.८५४ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन तो २ लाख ७२ हजार ७०५ कोटींवर जाण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील नव्या १३ मार्गासाठी तरतूद

यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांसह राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठीही आर्थिक निधी उपलब्ध करून प्रकल्प रुळावर आणले आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपीच्या प्रकल्पांसाठी ५७८ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तेवढीच रक्कम राज्य सरकारकडून मिळणार असल्याने प्रकल्पांना गती मिळेल. महाराष्ट्रातील १३ नवीन मार्ग आणि १४ दुहेरी मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील नवीन पादचारी पूल व उड्डाणपुलांच्या दुरुस्तीसाठीही निधी मिळाला आहे.

महाराष्ट्रातील नवीन मार्गाच्या कामांसाठी निधी दिल्यामुळे अमरावती-नारखेर, अहमदनगर-बीड-परळी-वैजनाथ, बारामती-लोणांद, वर्धा ते नांदेड, कराड ते चिपळूण, दिघी पोर्ट ते रोहा, इंदौर ते मनमाड, पुणे ते नाशिक, वैभववाडी ते कोल्हापूर, जेऊर ते आष्टी, फलटण ते पंढरपूर, हातकणंगले ते इचलकरंजी, सोलापूर ते उस्मानाबाद या मार्गाची कामे रुळावर येतील. याशिवाय दुहेरी मार्गामध्ये पेण ते रोहा, कल्याण ते कसारा तिसरा मार्ग, भुसावळ ते जळगाव तिसरा मार्ग, वर्धा ते नागपूर तिसरा मार्ग, वर्धा ते बल्लारशहा तिसरा मार्ग, पुणे ते मिरज ते लोंडा, दौंड मनमाडसह अन्य मार्गाचाही निधी उपलब्ध केला आहे.

मुंबई उपनगरीय मार्गावरील एमयूटीपी २, ३ व ३ ए प्रकल्पांसाठी ५७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे रखडलेले ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग तसेच एमयूटीपी-३ मधील पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल प्रकल्प मार्गी लागतील. एमयूटीपी-३ साठीही ५० कोटी रुपये मिळाले असून यामध्ये २५० वातानुकूलित लोकल, सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद कॉरीडोर यासह अन्य प्रकल्प आहे.