बँकांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या संपत्तीवर आता गडांतर येणार आहे. माल्ल्याची संपत्ती विकून बँका आता वसुली करू शकणार आहेत. पीएमएलएच्या विशेष न्यायालयानं भारतीय स्टेट बँक आणि अन्य बँकांना माल्ल्याची संपत्ती विकून कर्ज वसूल करण्याची परवानगी दिली आहे. तसंच सक्तवसूली संचलनालयानंही यावर हरकत नसल्याचं म्हटलं आहे.

तारीख केवळ रिकव्हरी ट्रिब्यूनलच ठरवू शकतो यावर माल्ल्याच्या वकीलांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, पीएमएलए न्यायालयानं या निर्णयावर १८ तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे. तसंच मल्ल्याला आता मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागता येणार आहे. बँकांना ९ हजार कोटी रूपयांचा चुना लावणाऱ्या मल्ल्यावर ब्रिटनमधील न्यायालयातही खटला सुरू आहे.

विजय मल्ल्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यातील निर्णय लंडन न्यायालयानं सुरक्षित ठेवला आहे. जानेवारी महिन्यात यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. तर विजय मल्ल्याची दिवाळखोरी घोषित करण्याची याचिकाही फेटाळजी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोट्यवधींचा चुना लावून डिसेंबर २०१६ मध्ये माल्ल्यानं लंडनमध्ये पळ ठोकला होता. सरकार आणि तपास यंत्रणा मल्ल्याला आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.