जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तरुणांना आधीच रोखण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. तसंच यासाठी महिला पोलिसांची मदत घेतली जाऊ शकते असा सल्लाही त्यांनी दिला आहे. नरेंद्र मोदींनी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील तरुण आयपीएस अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“तरुणांना सुरुवातीच्या टप्प्यावरच दहशतवादाकडे वळण्यापासून रोखलं पाहिजे. महिला पोलीस तेथील स्थानिक महिलांसोबत मिळून हे काम करु शकतात,” असं नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादावर बोलताना म्हटलं. आपल्या गणवेशामधून मिळणाऱ्या अधिकारांचं प्रदर्शन करता कामा नये तर गणवेशाचा अभिमान असला पाहिजे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. खाकी गणवेशासाठी आदर कधीच गमावू नका असा सल्ला नरेंद्र मोदींनी यावेळी तरुण अधिकाऱ्यांना दिला.

आणखी वाचा- समाजकार्यासाठी मोदींनी दान केले १०३ कोटी रुपये

“दिल्लीत मी नेहमीच येथून बाहेर पडणाऱ्या तरुण आयपीएस अधिकाऱ्यांशी चर्चा करतो. पण यावेळी करोनानमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. पण माझ्या कार्यकाळात एखाद्या टप्प्यावर नक्की भेट होईल याची खात्री आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- ‘Kill Narendra Modi’, पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल, एनआयएकडून अलर्ट

पुढे बोलताना ते म्हणाले की, “तणावात काम करताना योगा आणि प्राणायम सर्वोत्तम आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या ह्रदयासाठी काम करता तेव्हा नेहमीच फायदा होतो. मग तुम्ही कितीही काम केलं तरी तणाव येत नाही,” असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.