पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने कळस गाठला असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास ममता बॅनर्जींचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील पश्चिम बंगाल राज्य सरकार केंद्राने बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणइ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलेली आहेत. लोकशाहीत संविधानविरोधी कृत्य ममता बॅनर्जी करीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही व्यवस्थेत ममता बॅनर्जी या हुकूमशाही चालवत आहेत. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसी बळाचा वापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे खून होत आहेत. त्यांच्या राज्यात हिंसाचार बोकाळला आहे. कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न बंगाल मधील सामान्य जनतेला पडला आहे अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमधील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पश्चिम बंगालमधील गुंडाराज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रोखू शकत नसल्यामुळे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार त्वरित बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी तरच पश्चिम बंगालमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था पूर्ववत होईल अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.