संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींवर विश्वास दर्शवत ‘यस ही विल’ अशी घोषणा केली.
यावेळी राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात, नरेंद्र मोदींनी पक्षाचा प्रचार सुरू करताना एका भाषणात देशवासीयांसमोर ‘यह वी कॅन’ ची घोषणा करून आत्मविश्वास दर्शविला होता. आज मी या घोषणेचे रुपांतर ‘यस ही विल’ असे करून नरेंद्र मोदी उत्तम नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त करतो असे म्हटले. तसेच ते पुढे म्हणाले की, “भारताच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. एकहाती सत्ता मिळविण्याचा इतिहास भाजपने घडविला आहे. याआधी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी परिस्थिती होती. पण, आता भाजप विरुद्ध इतर पक्ष अशी परिस्थिती आहे. विकास आणि सुशासन हाच भाजपचा मुख्य उद्देश आहे. मला आज गर्व आहे आहे की, मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून आपले कर्तव्य निभावले आहे. भाजप देशातील नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेल आणि मोदींच्या विकासाच्या भूमिकेकडे पाहून मी ‘यस ही विल’ असे म्हणू इच्छितो.” असेही ते म्हणाले.