उत्तर प्रदेशात विहिरीत पडून ११ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुशीनगर जिल्ह्यात लग्नाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या महिलांना विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याप्रकरणी शोक व्यक्त करण्यात आला आहे.
नेबुओ नौरंगिया येथे अनेक महिला आणि तरुणी हळदीसाठी उपस्थित होत्या. यावेळी त्या विहिरीवर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीवर उभ्या होत्या. काही वेळाने वजन न झेपल्याने ही जाळी तुटली आणि त्यावर उभ्या सर्व महिला खाली विहिरीत पडल्या.
पोलीस आणि गावकऱ्यांनी जवळपास १५ महिलांची सुटका केली. तर ११ महिलांना मात्र वेळेत वाचवता आलं नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाला बचावकार्य तसंच जखमींवरील उपचारासाठी सर्व मदत करण्याचा आदेश दिला आहे.