कमी किंमत असलेल्या बहुचर्चित आकाश टॅब्लेटचे उत्पादन करण्यात असमर्थ ठरल्याचे सरकारने मान्य केल्याने या टॅब्लेटचे भवितव्य अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकले आहे. या टॅब्लेटच्या उत्पादनाचा संथ वेग पाहून संतप्त झालेल्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुंबई आयआयटीला खरमरीत पत्र लिहिले असून सर्व शर्तीसह या टॅब्लेटचा संपूर्ण पुरवठा ३१ मार्चपर्यंत करण्यास सांगितले आहे. हा पुरवठा न केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे सूतोवाचही पत्रात करण्यात आले आहे.
या टॅब्लेटवर अनेक विद्यार्थ्यांच्या अपेक्षा असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी सरकार राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहे. या टॅब्लेटचे उत्पादन हे आणखी एक आव्हान आहे. उत्पादनात नेमका अडथळा कोठे आहे, हे आव्हान आहे. उत्पादन वेळेत झाले तर विद्यार्थ्यांना ते वेळेत मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने म्हणजेच केवळ ११३० रुपयांना टॅब्लेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रथम एक लाख संचांचा पुरवठा करण्यास डेटाविण्डला सांगण्यात आले आहे, असे एम. एम. पल्लम राजू यांनी सांगितले.