दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेप्रकरणी अमेरिका आणि जर्मनी या देशांनी चिंता व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आता संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान देशातील लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित राहतील, अशी आम्ही अपेक्षा करतो, असं ते म्हणाले. त्यांच्या विधानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – ‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, भारतासह कोणत्याही देशात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान तेथील लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित राहतील, अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच प्रत्येक जण निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात मतदान करेल, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वी अमेरिकेनेही अरविंद केजरीवालांच्या अटकेबाबत चिंता व्यक्त केली होती. “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईवर भारतातील विरोधी पक्ष लक्ष ठेऊन आहेत. तसेच केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या प्रकरणावर आम्हीदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. निष्पक्षपणे कायद्याच्या प्रक्रियेचे पालन होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले होते.

हेही वाचा – मला तुरुंगात डांबणे हाच मोठा घोटाळा! केजरीवाल यांचा आक्रमक युक्तिवाद; कोठडीत चार दिवसांची वाढ

अमेरिकेबरोबरच जर्मनीनेही याबाबत चिंता व्यक्त केली होती. “अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईची दखल घेण्यात आली आहे. भारत लोकशाही असणारा देश आहे. केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे”, असे जर्मनीने म्हटले होते.