विवाहसोहळा आटोपून नवविवाहित जोडपे घरच्या वाटेवर असताना नवरी मुलीचे अपहरण झाले. राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील साविना रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी ही घटना घडली. नवरी मुलीच्या दुखावलेल्या प्रियकराने हे कृत्य केले. नवविवाहित जोडपे आणि नातेवाईक गाडीमधून नवऱ्या मुलाच्या घराच्या दिशेने चालले होते.

आरोपीने आपल्या काही साथीदारांसोबत मिळून गाडी अडवली व नवऱ्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यांनी गाडीची तोडफोड करुन नवरी मुलीचे अपहरण केले अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री तीतारडी भागात हे जोडपे विवाहबद्ध झाले होते. अपहरण झालेली मुलगी आधी सुद्धा आरोपीसोबत पळून गेली होती.

आरोपी आणि नवरी मुलीला शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती उदयपूरचे पोलीस अधीक्षक कैलाश चंद्र बिष्णोई यांनी दिली. नवरी मुलगी स्वत:हून आरोपीसोबत पळाली की, तिचे बळजबरीने अपहरण झाले ते अजून स्पष्ट झालेले नाही. मुलीच्या कुटुंबियांनी तिचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली आहे. राजस्थानातील महिन्याभरातील ही अशी दुसरी घटना आहे. एप्रिल महिन्यात अशाच प्रकारे नववधूचे तिच्या प्रियकराने अपहरण केले होते. नवरी मुलगी आणि आरोपी नंतर डेहराडूनमध्ये सापडले. तिथे ते कोर्ट मॅरेज करणार होते.