Tata Group compensation: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-१७१ विमानाचा आज दुपारी भीषण अपघात झाला. या विमानातील एकूण २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच हे विमान बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका वसतिगृहाच्या इमारतीला जाऊन आदळले होते. या इमारतीमधील काही जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे. यानंतर आता एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा ग्रुपने नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर संपूर्ण भारतासह जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. जगातील अनेक देशांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, या क्षणी आपल्या सर्वांना जे दुःख झाले आहे, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. ज्या कुटुंबांनी आपले जवळचे लोक गमावले आणि जे लोक जखमी आहेत, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांना टाटा ग्रुपने एक कोटींची भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. तसेच अपघातामुळे जे जखमी झाले आहेत, त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च टाटाकडून केला जाणार आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचेही एन. चंद्रशेखरन यांनी जाहीर केले.
याबरोबरच बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाची पुर्नबांधणी करण्याचेही आश्वासन टाटा ग्रुपने दिले आहे. या अपघातात इमारतीचे बरेच नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विमानाचा काही भाग इमारतीमध्ये घुसल्यामुळे इमारतीचा भाग कोसळला.