पीटीआय, बर्धमान (बंगाल)

जगातील विविधता स्वीकार करण्यावर भर देताना विविधता ही एकजुटतेमध्ये आहे यावर हिंदू समाजाचा विश्वास असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले. ते बर्धमान येथील साई मैदानावर संघाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करीत होते. यापूर्वी संघाच्या पथसंचलनास पश्चिम बंगाल पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तथापि कलकत्ता उच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पथसंचलन करण्यात आले.

‘संघ नेहमी हिंदू समाजाकडेच का लक्ष देतो असे लोक विचारतात. हिंदू समाज हा देशासाठी जबाबदार आहे,’ असे ते म्हणाले. संघाविषयी माहिती विचारणाऱ्या लोकांना उत्तर द्यायचे असेल तर संघ हिंदू समाजाला एकजूट करू इच्छितो कारण देशासाठी जबाबदार असलेला समाज हिंदू असल्याचे भागवत म्हणाले.

भारतात कोणीही सम्राट-महाराजांची आठवण ठेवत नाही, पण पित्याने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी १४ वर्षे वनवासात गेलेला राम आणि बंधू भरत आठवतात, हीच वैशिष्ट्ये भारताची व्याख्या करतात असे भागवत म्हणाले. या मूल्यांचे पालन करणारे लोक हिंदू आहेत आणि ते संपूर्ण देशाची विविधता एकसंध ठेवतात. आम्ही इतरांना दुखावणाऱ्या कृती करत नाही असा दावाही त्यांनी केला.

भारत केवळ भूगोल नाही; भारताचा एक स्वभाव आहे. काही लोक या मूल्यांनुसार जगू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतंत्र देश निर्माण केला. पण इथे राहिलेल्या लोकांनी भारताचे मूळ तत्त्व स्वाभाविकपणे स्वीकारले. हे मूळ तत्त्वच हिंदू समाज आहे. जगाच्या विविधतेचा स्वीकार करून भरभराट करणारा हा हिंदू समाज आहे. आपण ‘विविधतेत एकता’ म्हणतो, पण हिंदू समाज मानतो की विविधता हीच एकता आहे. – मोहन भागवत, सरसंघचालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे अस्तित्व शतकानुशतके

भारताची निर्मिती इंग्रजांनी केलेली नाही, भारताचे विभाजन होण्याची कल्पना इंग्रजांनी रुजवली होती, असे भागवत म्हणाले. भारत शतकानुशतके अस्तित्वात असून या देशातील नागरिकांचा विविधतेतील एकतेच्या संकल्पनावर विश्वास आहे. दरम्यान संघाच्या शाखांचा विस्तार आमच्यासाठी नाही, तर लोक एकत्र आले तर देश आणि जगासाठी फायदेशीर ठरेल असे ते म्हणाले.