पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच संपर्काच्या सर्व प्रकारच्या माध्यमांवर निर्बंध आणले होते. मात्र, आज मध्य रात्रीपासून हे निर्बंध उठवण्यात येणार असल्याने देखील ही खबरदारी घेतली जात आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांच्या माहितीनुसार, काश्मीर व्हॅलीमधील सर्व शाळा या सोमवारपासून सुरु होतील.

काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या तीन दिवसांपासून सीमेवर गोळीबार आणि घुसखोरांना पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यापर्श्वभूमीवर येत्या काळात खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यांची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये नेला आहे. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये गोंधळ माजवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे येथे तैनात सुरक्षा दलांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.