India Airstrike Operation Sindoor: भारताच्या लष्कराने मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पहलगामवरील भ्याड हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान पाकिस्तान सीमेवर असलेल्या पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील टिडींवाला ग्रामस्थांना मात्र वेगळीच चिंता सतावत आहे. काल रात्री ऑपरेशन सिंदूरची बातमी येण्यापूर्वी गावातील काही टवाळखोर तरुणांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले फटाक्यांच्या आवाजामुळे हल्ला झाला असावा, अशी धास्ती ग्रामस्थांना बसली. टवाळखोरांच्या या प्रँकमुळे आता टिडींवाला ग्रामस्थ गाव सोडून जात आहेत.

प्रकरण काय आहे?

टिडींवाला गावातील रहिवासी प्रकाश सिंग यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, “या गावात ७०० मतदार आहेत. काल रात्री फटाक्यांचे आवाज ऐकून काहीतरी भयानक घडायला सुरुवात झाल्याची भीती ग्रामस्थांना वाटू लागली. नंतर हा एक प्रँक होता, हे लक्षात आले. पण तेवढ्यात मध्यरात्री भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबविल्याची बातमी समोर आली. त्यामुळे आता गावकऱ्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही. मीही माझ्या पत्नी आणि मुलांना दूरच्या नातेवाईकांकडे पाठवत आहे.”

गावातून निघून जाणारे लोक स्वतःसह अंथरून-पांघरून, कपडे, अन्नधान्य आणि भाजीपाला नेत आहेत. आम्हाला नातेवाईकांवर ओझे व्हायचे नाही. आम्ही इथे जीव मुठीत धरून राहत आहोत. तसेच ज्या टवाळखोरांनी रात्री प्रँक केला, त्यांच्या पालकांनाही या कृत्याची लाज वाटत आहे, असेही प्रकाश सिंग पुढे म्हणाले.

मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर याठिकाणी एकूण ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला यातून प्रत्युत्तर दिले गेले.

आणखी एक ग्रामस्थ बिंदर सिंग यांनी म्हटले, सीमेपलीकडील पाकिस्तानच्या गावांतील लोकांनी आधीच गाव सोडले आहे. पलीकडे काहीच गतीविधी दिसत नाही, त्यामुळे हा धोक्याचा इशारा दिसतो. १९६५ आणि १९७१ च्या युद्धात काय झाले, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. त्यावेळी हा भाग पाकिस्तानने ताब्यात घेतला होता, नंतर भारताने तो पुन्हा मिळविला. आमची घरे लुटण्यात आली. त्यामुळे मी ७० क्विंटल गहू आणि जीवनावश्यक वस्तू कुटुंबासह हलविल्या आहेत. मी इथे गुरांची काळजी घेण्यासाठी थांबलो आहे. मी घर सोडून जाऊ शकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिडींवाला हे गाव सतलज नदीच्या काठावर बसले आहे. गावातील लोकांनी बोट, ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करून आपले सामान हलविले, असे प्रकाश सिंग म्हणाले. बिंदर आणि मी बोटीचा वापर करून कुटुंबाला दूर पाठवले.