Amit Shah Retirement Plan: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की, राजकीय जीवनातून निवृत्त झाल्यानंतर ते वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी वेळ देण्याची योजना आखत आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकारी संस्थांमधील महिलांसोबतच्या सहकार संवाद कार्यक्रमात बोलताना शहा यांनी वैयक्तिक श्रद्धा आणि धोरण या दोन्हींवर आपले विचार व्यक्त केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “मी निवृत्त झाल्यावर माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेती करण्यासाठी देण्याचे मी ठरवले आहे.”

अमित शहा म्हणाले की, “नैसर्गिक शेती हा एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे, ज्यामुळे अनेक फायदे होतात.” ते म्हणाले की, “रासायनिक खते दिलेला गहू खाल्ल्याने कर्करोग होतो, रक्तदाब वाढतो, मधुमेह होतो आणि थायरॉईडच्या समस्या निर्माण होतात. सुरुवातीला आपल्याला याबद्दल माहिती नव्हती.”

याबाबत पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, “खाणाऱ्याचे शरीर निरोगी राहण्यासाठी खते आणि रसायनांशिवाय अन्न खाणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की औषधांची गरज भासणार नाही. दुसरे म्हणजे, उत्पादन वाढते. आम्ही आमच्या शेतात नैसर्गिक शेतीचा अवलंब केला. आज माझे उत्पादन जवळजवळ दीडपट वाढले आहे.”

यावेळी शहा यांनी नैसर्गिक शेतीच्या पर्यावरणीय फायद्यांवरही भर दिला आणि ते म्हणाले, “जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा सहसा शेतातून पाणी वाहून जाते. परंतु सेंद्रिय शेतीत एक थेंबही बाहेर जात नाही, तो जमिनीत झिरपतो. कारण नैसर्गिक शेतीमुळे पाणी झिरपण्याचे मार्ग तयार होतात. खतांच्या अति वापरामुळे ते मार्ग नष्ट झाले आहेत.”

या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी मंत्री म्हणून त्यांच्या प्रवासावरही भाष्य केले आणि सहकार मंत्रालय त्यांच्यासाठी का विशेष आहे, हे सुद्धा सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, “जेव्हा मी देशाचा गृहमंत्री झालो, तेव्हा सर्वांनी मला सांगितले की मला एक अतिशय महत्त्वाचे खाते मिळाले आहे. पण ज्या दिवशी माझी सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा मला वाटले की माझ्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ज्याद्वारे देशातील शेतकरी, गरीब, गावे आणि प्राण्यांची सेवा करता येते.”