Asaduddin Owaisi Slams Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतावर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा फटकारले आहे. आज त्यांनी म्हटले की, “जर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला नसता, तर आज पाकिस्तान काहीच राहिला नसता. चीनच्या मदतीने पाकिस्तानने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरुद्ध संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्तावातून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’चे नाव कसे काढून टाकले”, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची बाजू मांडण्यासाठी आणि पाकिस्तानची दहशतवादी भूमिका जगासमोर उघड करण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश होता. न्यूज१८ शी बोलताना ते म्हणाले की, “चीनच्या पाठिंब्याशिवाय पाकिस्तान काहीच नाही, हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. चीनशिवाय ते पूर्णपणे अपंग आहेत.”
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची उपसंघटना असलेल्या टीआरएफने घेतली होती.
पुढे भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, तेव्हा टीआरएफने स्वतःला वाचवण्यासाठी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली. या हल्ल्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत टीआरएफचा निषेध केला जात असताना, पाकिस्तानने चीनच्या मदतीने तो रोखला. पण या प्रस्तावापूर्वी, भारतीय अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या दहशतवादी संघटनेच्या कारवायांबद्दल माहिती दिली होती.
तत्पूर्वी आज सकाळी ओवैसी म्हणाले होते की, “इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडून पाकिस्तानला दिला जाणारा निधी विकासासाठी वापरला जात नाही तर तो देशाच्या सैन्याकडे वळवला जात आहे.”
ते स्वीकारणे कठीण होते
राहुल गांधींच्या “सरेंडर” या वक्तव्याभोवती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, ओवैसी यांनी सीएनएन-न्यूज१८ शी बोलताना सांगितले की, “पाकिस्तानच्या डीजीएमओने भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीनंतरच शस्त्रविरामावर सहमती झाली. पण मला दुःख झाले की, हा निर्णय आपल्या राजकीय नेतृत्वाने जाहीर केला नाही; उलट आपल्याला तो अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटद्वारे कळाला. ते स्वीकारणे कठीण होते.”