Asaduddin Owaisi x Post : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसवर भारताने लष्करी हल्ला केल्यानंतर एअरबेसवरील एकमेव धावपट्टी एका आठवड्यासाठी बंद करण्यात आली आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे ही धावपट्टी उद्ध्वस्त झाली. यावरूनच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
“पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे त्यांचे भाडेतत्त्वावरील चिनी विमान रहीम यार खान एअरबेसवर उतरवू शकतील का?” असा उपहासात्मक टोला त्यांनी एक्स पोस्टद्वारे लगावला आहे. या विधानात एआयएमआयएम प्रमुखांनी चीनवरही निशाणा साधला आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर अनेक वेळा हल्ला केला, ज्याला भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शनिवारी (१० मे २००५) सांगितले की त्यांचा देश पाकिस्तानचे “सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य” राखण्यासाठी पाकिस्तानबरोबर उभा राहील. त्यावरून ओवेसी यांनी एकाच पोस्टमधून दोन्ही देशांना निशाणा साधला आहे.
पाकिस्तानचे एअरबेस आठवड्याभरासाठी बंद
दरम्यान, रहीम यार खान एअरबेस १० मे पासून बंद करण्यात आले असून १८ मेपर्यंत बंद राहणार आहे. पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने यासंदर्भात नोटम जाहीर केला आहे. या एअरबेसचे काम सुरू असल्याने बंद ठेवण्यात आले आहे. भारताने या हवाई तळावर हल्ला केल्याने त्याच्या व्यापक दुरुस्तीची आवश्यकता असल्याने हे तळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. “फ्लॅट ऑपरेशन डब्ल्यूआयपीसाठी आरडब्ल्यूवाय वापरता येत नाही”, असे नोटममध्ये म्हटले आहे.
“जोपर्यंत पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादासाठी त्यांच्या भूमिचा वापर करत राहिल, तोपर्यंत स्थिर शांतता शक्य नाही. शस्त्रविराम होवो किंवा न होवो आपण, आपण पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवाद्यांचा पाठलाग करणे सोडू नये”, असं असदुद्दीन ओवेसी यांनी शस्त्रविरामाची घोषणा झाली त्यावेळी म्हटलं होतं.