आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी गुरुवारी (१ सप्टेंबर) जे मदरसे देशविरोधी कामासाठी वापरले जात आहेत तर त्या मदरशांवर बुलडोझर चालवू, असा इशारा दिला आहे. बुधवारी (३१ ऑगस्ट) आसाममधील बोंगाईगाव जिल्ह्यातील एक मदरसा दहशतवादी संघटना अल-कायदाशी संबंधित असल्याचा आरोप झाल्यानंतर पाडण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री शर्मा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले, “मदरसे पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. हे मदरसे जिहादी गटांकडून वापरले जाऊ नये, एवढाच आमचा उद्देश आहे. कोणत्याही मदरशाच्या आड देशविरोधी कारवाया सुरू असल्याची आम्हाला माहिती मिळाली, तर त्या मदरशांवर बुलडोझर चालवू.”

अल-कायदाशी संबंध असल्याचा आरोप असणारा मदरसा पाडला

आसाम सरकारने अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असणारा बंगाईगाव जिल्ह्यातील मदरसा बुधवारी (३१ ऑगस्ट) पाडत कारवाई केली होती. या मदरशातील एका शिक्षकाला अल-कायदाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आसाममध्ये मागील महिनाभरात अशी कारवाई झालेला हा तिसरा मदरसा आहे.

पोलिसांनी हा मदरसा दहशतवादी कृतींसाठी अल-कायदाचा अड्डा म्हणून वापरल्याचा आरोप केलाय. यानंतर जिल्हा प्रशासनाने आठ बुलडोझरच्या मदतीने हा मदरसा पाडला. शुक्रवारी (२६ ऑगस्ट) पोलिसांनी मुफ्ती हाफिजूर हरमान नावाच्या शिक्षकाला अल-कायदाचा सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

यानंतर मंगळवारी (३० ऑगस्ट) पोलिसांनी या मदरशावर छापा टाकला. या छाप्यात अनेक प्रकारचं आक्षेपार्ह साहित्य सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी शिक्षक मुफ्ती रहमान २०१८ मध्ये या मदरशात शिक्षक म्हणून रुजू झाला होता.

हेही वाचा : विश्लेषण : अल कायदाचा नवा प्रमुख कोण असणार? त्याची निवड कशी होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी मदरसा पाडण्याचे आदेश दिले. मदरसा परिसरात सुरू असलेल्या विविध कृती करण्याची परवानगी या संस्थेकडे नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच या इमारतीत आपत्ती निर्माण झाल्यास त्यासाठीच्या सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचाही ठपका ठेवण्यात आला. या मदरशातील जवळपास २०० विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.