गुवाहाटी : आसाममधील पूरपरिस्थिती आणखी बिघडली आहे. २२ जिल्ह्यांमध्ये महापुराच्या प्रभावामुळे दोन मुलांसह आणखी सहा जण मरण पावले असून, सुमारे ७.२ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाम राज्य आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एडीएसएमए) पुराबाबतच्या दैनंदिन अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कामपूर महसूल मंडळात चौघांचा बुडून मत्यू झाला. होजाई जिल्ह्यातील डोबोका येथे एक जण, तर सिल्चर येथे एक मुलगा पुरामुळे मरण पावला.

आसाममध्ये यावर्षी पूर व भूस्खलन यामुळे मरण पावलेल्यांची संख्या २४ झाली आहे.

बारपेटा, बिश्वनाथ, कचार, दरांग, गोलपाडा, गोलाघाट, हैलाकंडी, जोरहाट, कामरूप, कार्बी आंगलाँग पश्चिम, करीमगंज, लखीमपूर, माजुली, मोरिगाव, नागाव, सोनितपूर व उदलगुडी अशा अनेक जिल्ह्यांमधील ७,१९४५० लोक पुरामुळे प्रभावित झाले असल्याचेही एडीएसएमएने सांगितले.

आजघडीला २०९५ खेडी पाण्याखाली असून, राज्यात ९५४७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचेही प्राधिकरणाच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

अधिकारी आठ जिल्ह्यांमध्ये ४२१ मदत शिबिरे आणि वाटप केंद्रे चालवत असून, या ठिकाणी १८६२६ मुलांसह ९१,५१८ लोकांनी आश्रय घेतला आहे. आसामच्या निरनिराळय़ा पूरग्रस्त भागांतून सुमारे २५३ लोकांना आतापर्यंत हलवण्यात आले आहे.