ओमायक्रॉनसह करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या कारणाने लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने घेतला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णालयांसाठी हे आदेश लागू नसल्याचे आसाम सरकारने सांगितले. करोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य नसल्याचा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर दिला होता. तरीही आसाम सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आसाममध्ये आता सार्वजनिक ठिकाणी जाताना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार आहे. प्रमाणपत्र असेल तरच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोमवारी लसीकरणाबाबत माहिती दिली. ज्यांना लस घेण्याची इच्छा नसेल, त्यांनी घरी बसावे. लसीकरण न झालेल्यांना कार्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. घराबाहेर पडताना नागरिकांनी आपले लसीकरण प्रमाणपत्र जवळ बाळगावे. प्रमाणपत्र असेल तरच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल, असे सरमा यांनी सांगितले. आसाममध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आसाममध्ये सोमवारी दैनंदिन रुग्णवाढीचा दर १०.७५ टक्के होता. १ जानेवारी रोजी हाच दर ०.७७ टक्के तर १३ जानेवारी रोजी ७.८७ टक्के होता. सध्या आसामममध्ये २३,९४८ उपचाराधीन रुग्ण आहेत.