पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वात मोठ्या हवाई तळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला आहे. तुरबत शहरात असलेल्या पीएनएस सिद्दीकी या हवाई तळावर बॉम्बस्फोट आणि गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने घेतली आहे. चीनची गुंतवणूक असल्याचा आरोप करत बीएलएने याठिकाणी हल्ला केला. एवढेच नाही तर ज्याठिकाणी चीनच्या ड्रोन्सचा तळ होता, तिथेच हल्ला केल्याचा दावा बीएलएने केला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने सहा हल्लेखोरांचा खात्मा केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर तुरबतमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही बीएलएने हल्ला केला होता.

बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार बीएलए संघटनेच्या माजीद ब्रिगेडने हा हल्ला घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. पाकिस्तानमधील डॉन या वर्तमानपत्राने तुरबतमधील मकरानचे आयुक्त सईद अहमद उमरानी यांच्या हवाल्याने या हल्ल्याची माहिती दिली आहे. उमरानी म्हणाले की, हवाई तळाच्या तीन बाजूंनी हल्लेखोरांनी जोरदार हल्ला केला. मात्र सुरक्षा दलांनी तात्काळ त्याल प्रत्युत्तर दिले. हवाई तळाच्या परिसरात येण्यापासून हल्लेखोरांना रोखण्यात यश मिळाले.

चीनची भागीदारी असलेल्या पाकिस्तानमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला; आठ अतिरेक्यांचा खात्मा

हवाई तळाच्या बाहेरच सहाही हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांच्या मृत्यूनंतर हवाई तळाची पाहणी करून सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली. हवाई तळाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे बीएलएने मात्र त्यांच्या हल्ल्यात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे. तसेच अनेकजण जखमी झाल्याचेही ते म्हणाले. मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये ज्या ज्या ठिकाणी चीन गुंतवणूक करत आहे, त्याठिकाणी हल्ले केले जात आहेत. पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन बलुचिस्तानच्या संसाधनचा विनाश करत आहेत, असा आरोप बीएलएकडून करण्यात येतो. यावर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने इराणमध्ये एअर स्ट्राईक करत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते.

बीएलएच्या माजीद ब्रिगेडकडून करण्यात आलेला या महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे. २० मार्च रोजी ग्वादर बंदरावर अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन सैनिक आणि आठ हल्लेखोर मारले गेले असल्याचे सांगितले जाते.