दोन दिवसांपूर्वी ६ फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनामुळे अडकून पडलेले ७ जवान शहीद झाल्याचं अखेर समोर आलं आहे. भारतीय लष्कराकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली असून एएनआयनं यासंदर्भात ट्वीट केलं आहे. दोन दिवसांपूर्वी हे जवान केमांग सेक्टरमध्ये अडकले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, अखेर ते शहीद झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

अरुणाचल प्रदेशमधील उंचावरच्या केमांग सेक्टरमध्ये हे सात जवान अडकले होते. गस्ती पथकाचा भाग म्हणून हे जवान या भागात गेले असता मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिमस्खलनामुळे ते केमांग सेक्टरमधल्या उंचावरच्या ठिकाणावर अडकून पडले होते. ६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, आज ही शोधमोहीम पूर्ण झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

“सर्व सात जवानांचे मृतदेह हिमस्खलन झालेल्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर देखील अडकलेल्या सात जवानांना वाचवण्यात आम्हाला अपयश आलं”, अशी माहिती लष्करातर्फे देण्यात आली आहे. “ज्या ठिकाणी हिमस्खलन झालं, ते ठिकाणी समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार ५०० फुटांच्या उंचीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील हवामान खराब झालं होतं. तसेच, या भागात बर्फवृष्टीदेखील होत होती”, असं देखील लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीही अशा प्रकारे हिमस्खलनामध्ये जवान शहीद होण्याच्या घटना घडल्या आहेत. मे २०२० मध्ये सिक्कीममध्ये अशाच प्रकारच्या हिमस्खलनाच्या घटनेमध्ये दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने संसदेमध्ये फेब्रुवारी २०२०मध्ये दिलेल्या माहितीनुसार सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात २०१९मध्ये ६ जवानांचा मृत्यू झाला असून देशातील इतर भागात घडलेल्या घटनांमध्ये ११ जवानांचा मृत्यू झाला आहे.