रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना मुदतवाढ दिली पाहिजे; एवढेच नव्हे, तर रोजगार, आर्थिक वाढ व चलनवाढ या तीनही क्षेत्रातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामातही स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे मत प्रिन्स्टन विद्यापीठातील भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.
राजन यांना मुदतवाढ द्यावी का, या प्रश्नावर त्यांनी पीटीआयला सांगितले की, हो, त्यांना मुदतवाढ दिलीच पाहिजे, किंबहुना त्यांच्या चांगल्या कामामुळे ते त्यासाठी योग्य आहेत. रोजगार, आर्थिक वाढ व चलनवाढ या तीनही क्षेत्रातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामातही स्वातंत्र्य दिले पाहिजे.
राजन यांना युपीए सरकारच्या काळात ४ सप्टेंबर २०१३ रोजी तीन वर्षांच्या मुदतीसाठी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर नेमण्यात आले होते.