अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करत आहेत. काँग्रेसला मात्र टीका करण्यातच धन्यता मानायची आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा घेऊन मोदी पुढे जात आहेत. मात्र काँग्रेस त्यावेळी फक्त टीका करण्यात व्यग्र आहे असं म्हणत आचार्य सत्येंद्र दास यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे.

काँग्रेस नेते उदीत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनुवादी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता आचार्य सत्येंद्र दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेत काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. ५०० वर्षांनी आपल्या देशात मनुवाद परतला आहे असं म्हणत उदीत राज यांनी टीका केली होती. त्यावर जोरदार प्रत्युत्तर देत आचार्य सत्येंद्र दास यांनी टीका केली.

आचार्य सत्येंद्र दास काय म्हणाले?

उदित राज यांनी जी टीका केली त्यावर उत्तर देताना आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत तो सबका साथ आणि सबका विकास आहे. काँग्रेसला सत्तेत यायचं आहे. मात्र काँग्रेसला सत्ता मिळणार नाही. कारण जनता निवडून देत असते. मात्र जनतेला काँग्रेसच्या धोरणांमध्ये, नीतीमध्ये काहीही रस नाही. त्यामुळे काँग्रेसचे लोक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाच करताना दिसतात.”

काँग्रेस नेते उदीत राज यांचं स्पष्टीकरण

काँग्रेस नेते उदीत राज यांनी स्पष्टीकरण देत असंही म्हटलं आहे की मी राम मंदिराचा विरोध केलेला नाही. मी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर जी पोस्ट केली आहे त्या पोस्टचा मंदिराशी संबंध जोडू नये असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदीत राज यांनी काय म्हटलं होतं?

काँग्रेस नेते उदीत राज यांनी सोमवारी एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी मनुवाद परतला आहे म्हटलं तर भाजपा मोदीप्रणित मीडियाला इतका झटका का लागला? आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा हे X वर पोस्ट करत नाहीत का? त्यांनी तर ब्राह्मण शुद्रांबाबतही पोस्ट केली होती जी नंतर डिलिट केली. असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आचार्य सत्येंद्र दास यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.