भीम आर्मीचे आझाद यांच्या सुटकेची मागणी

नवी दिल्ली : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची सुटका करावी तसेच नागरिकत्व कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर काढण्यात आलेला मोर्चा रोखण्यात आला.

या मोर्चात शेकडो लोक सहभागी होते. कडक सुरक्षा व ड्रोनच्या माध्यमातून देखरेख चालू असताना भीम आर्मीचे सदस्य हे जोरबागेतील दर्गा शहा ए मर्दान येथे जमले होते. तेथून ते मोर्चाने पंतप्रधान मोदी यांच्या लोककल्याण मार्ग यांच्या निवासस्थानी जाणार होते पण त्यांना पोलिसांनी मार्गावर अडथळे लावून अडवले.

कुणी हिंसाचार व जाळपोळीचा आरोप करू नये यासाठी त्यांनी हात बांधून हे आंदोलन केले. त्यांनी तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत बाबासाहेब आंबेडकर व भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्या चित्रांचे पोस्टर्स फडकावले. माजीद कमाल या मोर्चातील सहभागी व्यक्तीने सांगितले की, आम्ही हात बांधलेले आहेत त्यामुळे आम्ही हिंसाचार व जाळपोळ केली, असा आरोप कुणी करू शकणार नाही.

दरम्यान राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हबीबुल्ला यांनी म्हटले आहे, की नवीन कायदा हा राज्यघटनेतील तत्त्वांच्या विरोधात आहे. उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने निरपराध लोकांना अटक करण्यात आली, त्याचा सरकारने विचार करावा. जेव्हा खासदार आमच्यासाठी आवाज उठवत नाहीत, तेव्हा लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ येते.

दरम्यान, या मोर्चावेळी ड्रोनच्या मदतीने आंदोलकांवर देखरेख करण्यात येत होती. निदर्शकांना थांबवले असता त्यांनी पोलिसांना मोर्चा पुढे नेऊ देण्याची विनंती केली. चंद्रशेखर आझाद यांना गेल्या शुक्रवारी दर्यागंज येथे प्रक्षोभक भाषणे देऊन दंगल घडवून आणल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.