Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदारांनी पक्षाची साथ सोडली असून ते सत्ताधारी पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये (एनडीपीपी) सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या पक्षाचं विधानसभेतील संख्याबळ वाढलं असून एनडीपीपीला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सात आमदारांच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमधील विलीनीकरणामुळे एनडीपीपीच्या आमदारांची संख्या आता २५ वरून ३२ झाली आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीपीपी, भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे हे ७ आमदार सत्ताधारी एनडीपीपी पक्षात सामील झाल्यामुळे नागालँडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

दरम्यान, नागालँड सरकारमधील के.जी. केन्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत घेत सांगितलं की, “विधानसभेतील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ७ सदस्यांचा गट औपचारिकपणे एनडीपीपीमध्ये विलीन झाला आहे. तसेच नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या विकास कामांमुळे ७ सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच या ७ सदस्यांच्या सहभागामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांचं नेतृत्व आणखी बळकट होईल”, असंही के.जी. केन्ये यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली होती तेव्हा नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. आता या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडल्यामुळे नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे हा अजित पवारांसाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.