उपराष्ट्रपती न केल्यानेच नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडले असल्याचा दावा भाजपाचे खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला आहे. सुशील मोदी यांचा हा दावा नितीशकुमार यांनी फेटाळून लावला आहे. माझी अशी कोणतीही इच्छा नसल्याचं नितीशकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. हा एक बोगस विनोद आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

“सुशील मोदी यांनी मला उपराष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. कसला विनोद करत आहेत, माझी अशी कोणतीही इच्छा नाही. त्यांच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला आम्ही कितपत पाठिंबा दिला हे विसरले का? आम्ही निवडणूक संपण्याची आणि त्यानंतर बैठक बोलावण्याची वाट पाहत होतो,” असं नितीशकुमार यांनी सांगितलं आहे. त्यांना हवं तितकं बोलू द्या असंही ते म्हणाले.

विश्लेषण : धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांचा राजकीय फायदा की तोटा?

सुशील मोदी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीशकुमारांची उपराष्ट्रपती होण्याची इच्छा होती असा दावा केला. ६ ऑगस्टला झालेल्या या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.

“नितीश यांनी उपराष्ट्रपती व्हायचं होतं. जेडीयूच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपाशी संपर्क साधत शक्यता पडताळून पाहिली होती,” असं सुशील मोदी म्हणाले होते.

बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार! नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीशकुमार यांनी भाजपासोबत युती तोडल्यानंतर आरजेडीसोबत हातमिळवणी करत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केलं असून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भविष्यात राष्ट्रीय राजकारणात सहभागी व्हायचं असल्यानेच नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. नितीशकुमार यांनी मतदारांचा अपमान केल्याचा आरोप भाजपा करत आहे.