Bihar Politics: यावर्षी होऊ घातलेल्या बिहार निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. एनडीएमधील घटक पक्षांना बरोबर घेऊन भाजपा पुढे जात असताना आता जागावाटपासंदर्भात काही आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. बिहारमधील घटकपक्ष आपापली ताकद दाखवून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बिहारमध्ये सध्या जनता दल संयुक्त पक्षाच्या नेतृत्वाखालचे सरकार आहे. भाजपा आणि जेडीयूबरोबर एनडीएत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचा लोजप (रा), केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांचा ‘हम’ आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाहा आहेत.

भाजपा आणि जेडीयू हे प्रमुख पक्ष असल्यामुळे त्यांच्या पारडयात अधिक जागा पडतील, असे मानले जाते. मात्र इतर पक्ष अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी आता आक्रमक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. या प्रतिक्रियामधून भाजपा-जेडीयूवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

केंद्रीय मंत्र्यांचा वरचष्मा

लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी आरा येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांच्यात बराच दम असल्याचे म्हटले. उपस्थितांच्या उत्साही प्रतिसादामुळे चिराग पासवान उस्फुर्तपणे राज्यातील सर्व २४३ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे बोलून गेले. तसेच एनडीएला आणखी बळकट करण्यासाठीच आपण हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. एनडीएसाठी त्यांनी केलेले भाष्य आपल्या पहिल्या विधानातून पळवाट काढावी, यासाठी केल्याचे म्हटले जाते.

चिराग पासवान यांच्या पक्षाचे पाच खासदार बिहारमध्ये आहेत. त्यांच्या जोरावर अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा पासवान यांचा प्रयत्न आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचे सांगितले जाते.

जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाचीही अशीच स्थिती आहे. राज्यातील महादलित मतदारांच्या पाठिंब्यासाठी त्यांचा पक्ष कमीत कमी ३० जागांवर निवडणूक लढवू इच्छितो. महादलित समुदायाच्या विकासासाठी त्यांच्या पक्षाचे २० आमदार विधानसभेत असणे आवश्यक आहे, असे ते अनेकदा बोलले आहेत. वीस आमदार निवडूण आणण्यासाठी त्यांना कमीत कमी ३० ते ३५ जागांवर लढावे लागणार आहे. हम पक्षातील इतर अनेक नेत्यांनी एवढ्या जागा मिळाव्यात, यासाठी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जीतनराम मांझी यांच्या रुपाने बिहारमध्ये हम पक्षाचा केवळ एकच खासदार आहे. त्यांचे सुपुत्र संतोष सुमन हे बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत.

उपेंद्र कुशवाहांकडूनही दबावाचे राजकारण

राष्ट्रीय लोक मोर्चाचे (रालोमो) प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार उपेंद्र कुशवाहा यांचाही पक्ष एनडीएचा घटक आहे. रालोमो पक्षाचा एकही आमदार सध्या बिहार विधानसभेत नाही. कुशवाहा यांचा पक्ष किती जागा लढविणार हे त्यांनी जाहीर केले नसले तरी त्यांच्या पक्षाचे नेते अधिक जागा मिळविण्यासाठी दबाव टाकत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागा असून भाजपा आणि जेडीयू कमीत कमी प्रत्येकी शंभर जागांवर निवडणूक लढवू शकतात. उरलेल्या ४३ जागा मित्रपक्षांना दिल्या जाऊ शकतात. यातील जास्त जागा मिळाव्यात यासाठी तीनही पक्ष प्रयत्नशील आहेत.