लोकसभा निडणुकीच्या अखेरच्या ७ व्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. ५९ जागांवर होत असलेल्या या मतदानानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी आज (दि.१९) मतदान पार पाडल्यानंतर संध्याकाळी ६ नंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल येण्यास सुरुवात होईल. दरम्यान, राजकीय पक्षांच्या जागांची परिस्थिती काय असेल याचा अंदाज घेऊन सत्तास्थापनेसाठी महाआघाडीची चाचपणी सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सुरु आहे. त्यासाठी गेल्या २४ तासांत त्यांनी दोनदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच नुकतीच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांची देखील भेट घेतली. तर संध्याकाळी ते युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

यापूर्वी चंद्राबाबूंनी शनिवारी राहुल गांधी, शरद पवार त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती यांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून भाजपाला सत्तेतून दूर करण्यासाठी पंतप्रधानपदाचा त्याग करण्याची तयारी असल्याचे विधान आले होते. त्यामुळे महाआघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोण असतील याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, महाआघाडीबाबत शरद पवार यांनी म्हटले आहे की, सर्वच पक्ष आता २३ मे ची वाट पाहत आहेत. दरम्यान, निकाल समोर येईल त्यानंतरच स्पष्टपणे काहीतरी सांगता येईल. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते की, पंतप्रधानपदाशिवाय काँग्रेस महाआघाडीला पाठींबा देऊ शकते. मात्र, त्यानंतर त्यांनी घुमजाव करीत काँग्रेसने कधीही पंतप्रधानपद नाकारलेले नाही असे म्हटले होते.

भाजपाला बहुमत मिळाले नाही तर अशा परिस्थितीत संभाव्य आघाडीबाबत चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी २३ मे रोजी २१ विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुन्हा कार्यरत होण्यामुळे त्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड झाल्यानंतर त्या युपीएच्या समन्वयक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.