Chhattisgarh Naxals News : केंद्र सरकारने छत्तीसगडसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नक्षलवादी संघटनांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. नक्षलवाद्यांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं आहे. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवरील कर्रेगुट्टालू हिल्सवर (केजीएच) सुरक्षा दलाची तुकडी व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ कुख्यात नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर एक पोस्ट करून या कारवाईची माहिती दिली आहे.
‘नक्षलमुक्त भारत’ या नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. अलीकडच्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी त्यांची नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.
अमित शाह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की नक्षलमुक्त भारताच्या संकल्पात ऐतिहासिक यश मिळालं आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात सुरू केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईदरम्यान छत्तीसगड व तेलंगणाच्या सीमेवरील कर्रेगुट्टालू हिल्सवर झालेली ही कारवाई आजवरची नक्षलवाद्यांविरोधातील सर्वात मोठी कारवाी असल्याचं म्हटलं जात आहे.
गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले?
अमित शाह यांनी याबाबत केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “नक्षलमुक्त भारत घडवणं हा आमचा संकल्प आहे. या संकल्पाला ऐतिहासिक यश मिळालं आहे. आपल्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवरील कर्रेगुट्टालू हिल्समध्ये लपून बसलेल्या ३१ कुख्यात नक्षलवाद्यांना त्यांनी ठार केलं आहे. या कर्रेगुट्टालू हिल्सवर एके काळी लाल दहशतवादाचं राज्य होतं. येथे लाल दहशतवादाचं मळभ दाटलं होतं. मात्र, आज तिथे आपल्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत आहे. कर्रेगुट्टालू हिल्सवर नक्षलवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. मात्र, आपल्या सुरक्षा दलांनी त्यांचं कंबरडं मोडलं आहे”.
२१ दिवसांची कारवाई
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “कर्रेगुट्टालू टेकडी हे पीएलजीए बटालियन १, डीकेएसझेडसी, टीएससी व सीआरसीसारख्या प्रमुख नक्षलवादी संघटनांचं संयुक्त मुख्यालय होतं. या ठिकाणी नक्षलवाद्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच रणनिती आखणे, शस्त्रसाठा करणे अशा कारवाया केल्या जात होत्या. आपल्या सुरक्षा दलांनी त्यांच्या प्रमुख केंद्रावरच हल्ला केला. नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई २१ दिवस चालली. या कारवाईदरम्यान ३१ कुख्यात नक्षलवादी ठार झाले.