मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी केंद्रामध्ये पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारली होती तेव्हा काँग्रेसची सत्ता नऊ राज्यांवरुन केवळ छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यांपूर्ती मर्यादित राहिली होती. अशीच काही परिस्थिती आता पुन्हा दिसत आहेत. मतदारांचा विश्वास जिंकण्यात आणि खंबीर नेतृत्व या दोन आघाड्यांवर काँग्रेस कमी पडत असल्याचं नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निकालांवरुन स्पष्ट झालंय. चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळला आहे. तर पाच राज्यांपैकी एकाही राज्यात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. उलट हातचं पंजाब राज्यही आपकडे गेल्याने काँग्रेस आता देशात केवळ पाच राज्यांमध्ये सत्तेत आहे.

नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

काँग्रेससाठी हा धोक्याचा इशारा असल्याचं मानलं जात आहे. २०१४ नंतरच्या ४५ निवडणुकांपैकी केवळ पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजय मिळवता आलीय. मात्र काँग्रेसने आता पक्षाला उभारी देण्याचे प्रयत्नही सोडून दिल्यासारखं चित्र दिसतंय. पाच राज्यांमधील निवडणुकांआधीच पक्षात निराशेचं वातावरण होतं. निकालानंतर काँग्रेसमध्येच दोन गट पडतील असा अंदाजही आधीच व्यक्त करण्यात आलेला आणि आता हळूहळू त्याची चाहूल लागताना दिसत आहे.

नक्की वाचा >> Election Results: “काँग्रेस पक्ष ‘तृणमूल’मध्ये विलीन करावा, असं झाल्यास…”; काँग्रेसला ऑफर

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी संकेत दिले आहेत की पक्षाची पुढील वाटचाल कशी असावी यासंदर्भातील चर्चेसाठी पक्षाच्या कार्य समितीची बैठक लवकरच बोलवण्यात येणार नाही. मात्र अनेक नेत्यांना यासंदर्भात काहीच कल्पना नसल्याची माहिती समोर येतेय. पंजाबमधील आपच्या दमदार विजयानंतर काँग्रेसमधील काही तरुण नेत्यांनी काँग्रेसमधील ‘जुन्या आणि थकलेल्या’ नेत्यांनी आता तरुणांसाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी केलीय.

नक्की वाचा >> Election Results: पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेना म्हणते, “माकडांच्या…”

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील सदस्यांनी अनेक दिग्गज नेत्यांनी हा पराभव म्हणजे “आम्ही तुम्हाला आधीच कल्पना दिलेली” अशा प्रकारचा आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य असणाऱ्या गुलाम नबी आजाद यांनी, “मी थक्क झालोय. एकामागोमाग एक वेगवगेळ्या राज्यांमध्ये पक्षाचा पराभव पाहून मनाला फार उदास वाटतं. आम्ही पक्षासाठी आमच्या तारुण्याचा संपूर्ण काळ आणि आयुष्य दिलंय,” असं म्हणत नाराजी व्यक्त केलीय. पुढे बोलताना आजाद यांनी, “मला विश्वास आहे की मी आणि माझे काही सहकारी मागील बऱ्याच काळापासून ज्याबद्दल भाष्य करतोय त्या सर्व कमतरतांवर पक्ष नेतृत्व लक्ष देईल,” अशी अपेक्षाही व्यक्त केलीय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

निकालावर शशी थरुर यांनी प्रतिक्रिया देताना जर काँग्रेसला आपलं नशीब बदलण्याची इच्छा असेल तर आता ते बदल टाळू शकत नाही असं स्पष्टच सांगितलं आहे. शशी थरुर यांनी काँग्रेसच्या अन्य नेत्यांप्रमाणे परिवर्तनाचं समर्थन केलं आहे. शशी थरुर म्हणाले आहेत की, “काँग्रेसवर विश्वास असणाऱ्या सर्वांना विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून दु:ख झालं आहे. काँग्रेसने मांडलेल्या भारताच्या कल्पनेला आणि देशासमार मांडलेला सकारात्मक अजेंडा यांना मजबूत करण्याची हीच वेळ आहे”.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांपैकी काही नेत्यांची शनिवारी गुलाम नबी आजाद यांच्या घरी बैठकीसाठी भेटणार आहेत. त्यानंतर पुढे पक्ष नेतृत्वाकडे आपलं म्हणणं कसं मांडायचं आणि या निकालानंतर पुढील वाटचाल कशी असावी याबद्दल काय सांगावं यावर चर्चा केली जाणार आहे. सध्या काँग्रेसमध्ये फूट पडू नये आणि पक्ष एकत्र बांधून ठेवणं ही दोन मोठी आव्हानं आहेत. गुलाब नबी आजाद यांनी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, “मी माझं संपूर्ण तारुण्य आणि जीवन ज्या पक्षासाठी खर्च केलं त्या पक्षाला अशाप्रद्धतीने जीव सोडताना मी पाहू शकत नाही. गोवा, उत्तराखंडमध्ये पक्षाने जिंकायला हवं होतं. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून एवढ्या वाईट प्रकारे काँग्रेसचा पराभव होईल असा मी विचारही केला नव्हता,” असं म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीत सुरजेवाला यांनी निवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेत्यांना एक संदेश दिलाय. “आम्ही पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये यापेक्षा चांगल्या निकालांची अपेक्षा करत होतो. या निवडणुकीमध्ये भावनिक मुद्द्यांनी लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या मुद्दांना मागे टाकलं. आपण ज्या फांदीवर बसलोय तिलाच कापलं तर झाड, फांदी आणि नेतेही पडणार. आज अनेक राज्यांमध्ये हेच चित्र पहायला मिळत आहे. पदाची इच्छा एवढी तीव्र झालीय की आपण त्याच झाडाला नुकसान पोहोचवतोय ज्यावर काँग्रेसचे लोक बसले आहे. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे,” असं सुरजेवाला यांनी म्हटलंय.