काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वात फरक सांगितल्यानंतर आता काँग्रेसचे आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील हिंदुत्वावरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “सत्तेत बसलेल्या लोकांसाठी केवळ ८० टक्के लोकच अस्सल भारतीय आहेत. तर आमच्या नजरेत सर्वजण भारतीय आहेत. याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटले की माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंपेक्षा भारताच्या विविधतेला कुणीच समजलं नाही.” राहुल गांधींनी अशातच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भारतात द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला होता आणि हिंदू व हिंदुत्वामधील फरक सांगितला होता. यानंतर भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांचं हे विधान समोर आलं आहे. काय म्हणाले मणिशंकर अय्यर ? - अय्यर म्हणाले की, “राहुल गांधी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी हे सांगितलं की, हिंदू धर्म आणि हिंदुत्वामध्ये अंतर आहे. मी त्यासोबतच हे सांगू इच्छितो की, अंतर हे आहे की आपण जो हिंदू धर्मावर विश्वास ठेवतो, आपण १०० टक्के भारतीय आहोत. आपण सर्व जे या देशाचे रहिवासी आहोत, त्यांना आपण भारतीय समजतो आणि काहीजण आहेत आपल्यामध्ये जे आज सत्तेत आहेत, ज्यांचे म्हणणे आहे की नाही, ८० टक्केच भारतीय, जे की ८० टक्के हिंदू धर्माला मानतात तेच अस्सल भारतीय आहेत.” तसेच भाजपावर निशाणा साधताना त्यांनी पुढे म्हटले की, “त्यांच्या नजरेत उर्वरीत जे लोक आहेत ते अभारतीय आहेत आणि आपल्या देशात ते राहत आहेत. तर पाहुणे बनून ते राहत आहेत. जेव्हा पण आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही त्यांना काढून टाकू. या देशात त्यांचे एकच कर्तव्य आहे, ज्या मार्गावर आम्ही निघालेलो आहोत, त्याच मार्गाने त्यांनी देखील चालावं.” याचबरोबर नेहरू यांची आठवण काढत अय्यर म्हणाले की, “भारताची जी विविधता आहे ती कदाचित जवाहरलाल नेहरूंपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कुणीच समजली नाही. त्यांना माहीत होतं की भारतात अनेक भाषा आहेत, अनेक जाती आहेत, अनेक रंग आहेत, अनेक प्रकारचे साहित्य आहे, अनेक बोली बोलल्या जातात.”