देशाला जनतेच्या वेदना दूर करू शकणार्‍या राष्ट्रपतीची गरज आहे, त्यामुळे मतभेद विसरुन विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी नेत्यांशी सोनिया गांधी यांनी संपर्क साधला आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी अन्य नेत्यांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिली. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी करोनातून बरे होईपर्यंत मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

हेही वाचा – राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी; भाजपचा मार्ग सोपा; प्रादेशिक पक्षांना महत्त्व

मन मोकळे ठेवा
राज्यघटना, लोकशाही संस्था आणि नागरिकांचे सत्ताधारी पक्षाच्या हल्ल्यापासून संरक्षण करू शकेल अशा राष्ट्रपतीची देशाला गरज आहे, असे काँग्रेसचे मत आहे. मात्र, काँग्रेसने उमेदवाराचे नाव सुचवलेले नाही. पक्षाने म्हटले आहे की असा अध्यक्ष निवडला पाहिजे जो भारताची ‘तुटलेली सामाजिक बांधणी’ एकत्र करण्याचे काम करेल आणि लोकांच्या वेदना दूर करेल.ही भावना लक्षात घेऊनच चर्चा आणि विचारमंथन खुल्या मनाने व्हायला हवे, असे पक्षाने निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसने इतर राजकीय पक्षांसोबत ही चर्चा पुढे नेली पाहिजे, असे आमचे मत असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

हेही वाचा- इतिहासकारांनी केवळ मुघलांनाच महत्त्व दिलं, आता वेळ आली आहे की आपण… : अमित शाह

१८ जुलै रोजी मतदान होणार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जून रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे. ३० जूनपर्यंत अर्जाची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जुलै आहे. १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.