नवी दिल्ली : काँग्रेसचे संकल्प सत्याग्रह आंदोलन हे घटनेच्या विरोधातील आणि न्यायालयाच्या निकालाविरोधात आहे, अशी टीका भाजपने केली. राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात काढलेल्या उद्गारांबद्दल त्यांना शिक्षा झाली आहे, असा दावाही भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला. न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी अपात्र ठरले आहेत, मग हा सत्याग्रह कशासाठी असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी मानहानीच्या खटल्यामध्ये दोषी सिद्ध झाल्यानंतर आणि त्यामुळे ते लोकसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरल्यानंतर हे आंदोलन म्हणजे काँग्रेसचा अहंकाराचे प्रदर्शन आहे, त्याचा सत्यासाठी लढण्याशी काहीही संबंध नाही अशी तिखट टीका त्यांनी केली. काँग्रेसचे आंदोलन म्हणजे महात्मा गांधी यांचा अपमान आहे अशी टीकाही त्यांनी केली. तुम्ही एका संपूर्ण मागासवर्गीय समुदायाचा अपमान केला त्याचे समर्थन करत आहात की शिक्षा सुनावलेल्या न्यायालयाविरोधात आंदोलन करत आहात की ज्या कायद्याअंतर्गत तुम्ही अपात्र ठरलात त्याच्या विरोधात आंदोलन करत आहात? - सुधांशु त्रिवेदी, प्रवक्ते, भाजप