Corona Update : करोना कित्येक महिने शांत राहिल्यानंतर पुन्हा एकदा भारतातील शहरी भागांमध्ये पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये या महिन्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय राजधानीत गेल्या तीन वर्षांत प्रथमच कोरोनाची लागण झालेले २३ रुग्ण आढळले आहेत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. असे असले तरी बहुतेक प्रकरणे ही सौम्य असून काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच आतापर्यंत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.

दक्षिण आशियामध्ये जेएन.१ व्हेरिएंटच्या प्रसारामुळे करोना रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. हा व्हेरियंट ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्हेरियंट चांगलाच सक्रिय असला तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून याचे वर्गीकरण चिंताजनक व्हेरिंयंट असे करण्यात आलेले नाही.

या संक्रमणाची लक्षणे बऱ्याचदा सौम्य स्वरूपाची आहेत आणि लागण झालेले रुग्ण चार दिवसांच्या आत बरे होत आहेत . ताप, नाक वाहने, गळा खवखवणे, डोकेदुखी, चक्कर आणि थकवा येणे ही काही सामान्य लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात.

दिल्लीत करोना व्हायरसचे २३ रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे येथील भाजपा सरकारने रुग्णालयांना बेड, ऑक्सिजन सिलिंडर, चाचणी किट्स आणि लसी तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली सरकारने रुग्णालयांना आरोग्य डेटा संबंधी इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मवर दररोज इन्फ्लूएंझा सारखे आजार (ILI) आणि सिव्हर अक्युट रेस्पिरेटरी आजारांच्या (SARI) प्रकरणांची संख्या अपलोड करण्याचे निर्देश दिले आहे.

दिल्ली-एनसीआरमधील शहरे जसे की नोएडा आणि गाझियाबाद येथे देखील करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी नोएडा येथे पहिला रुग्ण आढळला आहे.

केरळमध्ये मे महिन्यात २७२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात ही संख्या सर्वाधिक असल्याने येथील आरोग्य मंत्र्‍यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने रुग्णालयात मास्क लावणे बंधनकारक केले आहे. कर्नाटकमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथे ३५ संसर्गाची नोंद झाली आहे. ज्यापैकी एक नऊ महिन्याचे बाळ देखील आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात काय स्थिती?

मुंबईत मे महिन्यात आतापर्यंत ९५ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण कोविड संसर्गांपैकी बहुतेक जण हे मुंबईतीलच आहेत. गंभीर बाब म्हणजे येथे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबई महापालिकेने लक्षणे असणाऱ्या सर्वांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. फक्त १६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तसेच ठाणे येथे गेल्या तीन दिवसांत कोरोनाचे तब्बल १० रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.