देशभरात ६० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग देशात हळूहळू वाढत असून करोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा देखील काहीसा कमी झालेला दिसून येत आहे. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशात २९ हजार ६१६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ३१ हजार ३८२ इतका होता. त्यामुळे नव्या करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट गेल्या २४ तासंमध्ये दिसून आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत देशात ३ कोटी २८ लाख ७६ हजार ३१९ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजघडीला देशात ३ लाख १ हजार ४४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे देशात सरासरी रिकव्हरी रेट हा ९७.७८ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, नव्या करोनाबाधितांच्या संख्येप्रमाणेच देशातील मृतांचा आकडा देखील खाली आला आहे. गुरुवारी देशात ३१८ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. हाच आकडा आज २९० पर्यंत खाली आला आहे. आत्तापर्यंत देशभरात ४ लाख ४६ हजार ६५८ करोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.

दरम्यान, देशातील लसीकरणाने आता वेग पकडायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण ७१ कोटी ४ लाख ०५१ लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देण्यात आलेल्या डोसची संख्या ८४ कोटी ८९ लाख २९ हजार १६० इतकी झाली आहे.