पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, "हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल". हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. "पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यात येईल. अर्थमंत्री यांच्याकडून स्वावलंबी भारत अभियानाची विस्तृत माहिती दिली जाईल असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे. सुधारणा राबवणं हे महत्वाचं आहे. सुधारणा राबवल्यामुळेच संकटात टिकलो आहोत. कोणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हेदेखील त्यावेळेस झालं आहे ज्यावेळेस सगळं बंद होतं. सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील," असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. #WATCH "I announce a special economic package today. This will play an important role in the 'Atmanirbhar Bharat Abhiyan'. The announcements made by the govt over COVID, decisions of RBI & today's package totals to Rs 20 Lakh Crores. This is 10% of India's GDP": PM Narendra Modi pic.twitter.com/1TndvLK9Ro — ANI (@ANI) May 12, 2020 स्वावलंबी भारत हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. “संपूर्ण जग २१ वं शतक भारताचं असेल असं सांगत होतं. आपण गेल्या शतकापासून २१ वं शतक भारताचं असल्याचं ऐकत आहोत. करोना संकटानंतरही जगात जी स्थिती निर्माण होत आहे ती आपण पाहत आहोत. २१ वं शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता त्यासाठी स्वावलंबी भारत हाच एकमेव मार्ग आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. भारत जेव्हा स्वावलंबी होण्याबद्दल बोलतो तेव्हा आत्मकेंद्रीत व्यवस्थेबद्दल सांगत नाही. संसाराचं सुख, मदत आणि शांतीची चिंता दर्शवतो. भारताच्या विकासात नेहमी विश्वाची चिंता दिसली आहे. भारताच्या कामाचा प्रभाव विश्वावर पडतो असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. "जगात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून पावणे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका व्हायरसने संपूर्ण जगाचं नुकसान केलं आहे. असं संकट ना कधी पाहिलं ना ऐकलं आहे. हे संकट खूप मोठं आहे. पण थकणं, पराभूत होणं माणसाला मंजूर नाही. सतर्क राहूनही सर्व नियमांचं पालन करायचं आहे. जीव वाचवायचा आहे आणि पुढे वाटचालही करायची आहे. जग संकटात असताना आपल्याला कठोर संकल्प करण्याची गरज आहे. आपला संकल्प या संकटापेक्षाही विराट असणार आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. “एक राष्ट्र म्हणून आज आपण महत्त्वाच्या वळणावर आहोत. करोना संकट भारतासाठी एक संकेत, संदेश, संधी घेऊन आली आहे. जेव्हा करोना संकट सुरु झालं तेव्हा भारतात एकही पीपीई किट तयार नव्हतं. एन-९५ मास्कचं नावापुरतं उत्पादन होत होतं. पण आता भारतात रोज दोन लाख पीपीई किट्स आणि दोन लाख मास्क तयार केले जात आहेत. हे करु शकलो कारण आपण संकटाला संधीत रुपांतरित केलं. आज जगभरात स्वावलंबी शब्दाचा अर्थ आपण पूर्णपणे बदलला आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.