दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या १० गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये अग्निवीर योजना बंद कली जाईल, देशभरात दिल्ली-पंजाबसारखी २०० युनिटपर्यंत २४ तास मोफत वीज, कत्रांटी नोकऱ्या बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात येतील, यासह आधी मोठ्या घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केल्या आहेत.

केजरीवालांच्या १० गॅरंटी कोणत्या?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशातील सर्व गरिबांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा त्यांनी केली. आपल्या देशात ३ लाख मेगावॅट विजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. मात्र, आपण त्याचा वापर फक्त २ लाख मेगावॅट एवढाच करतो, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

उत्कृष्ट आणि मोफत शिक्षण

‘आमची दुसरी गॅरंटी ही शिक्षणसाठी आहे. सर्वांसाठी चांगले आणि उत्कृष्ट तसेच मोफत शिक्षण देऊ. सरकारी शाळा या खासगी शाळांपेक्षा जास्त चांगले शिक्षण देऊ शकतात. आम्ही शिक्षणाचे मॉडेल दिल्लीत राबवले आहे, असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; “उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच…”

चांगली आरोग्य सेवा

आम्ही तिसरी गॅरंटी ही आरोग्याची देत आहोत. प्रत्येकासाठी चांगल्या प्रकारचा उपचार मिळायला हवा. प्रत्येक गावात मोहल्ला दवाखाने उघडले जातील. जिल्हा रुग्णालयांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर केले जाईल, असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

अग्निवीर योजना बंद केली जाईल

अग्निवीर योजना लष्करासाठी घातक असून ती कायम स्वरुपी बंद केली जाईल. याबरोबरच कत्रांटी नोकऱ्या बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या जातील. तसेच भारतीय सैन्यास विशेष अधिकार दिले जातील,असं आश्वासनही केजरीवाल यांनी दिलं.

पुढं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या पिकाला जर योग्य दर मिळाला तर शेतकरी सन्मानाचे जीवन जगू शकतो. त्यामुळे स्वामीनाथन अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना भाव दिला जाईल. तसेच आमची पुढची गॅरंटी ही दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा असेल. याबरोबरच देशातील व्यापाऱ्यांसाठी धोरणं आखण्यात येईल. व्यापाऱ्यांना जास्त परवानग्यांची गरज असणार नाही.

भाजपाच्या वॉशिंग मशिनला तोडण्याचं काम आमचे सरकार आल्यानंतर करणार आहे. सध्या भाजपा प्रामाणिक लोकांना तुरुंगात टाकण्याचं काम करत आहे आणि भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देत आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मोदींनी सांगितले होते की,प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जातील. पण तसे काही झाले नाही. दोन कोटी नोकऱ्या ते देणार होते. पण त्याही मिळाल्या नाहीत. मात्र, दुसरीकडे उत्तम शाळा, मोहल्ला दवाखाने, यासह शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेबाबत आम्ही हमी दिली होती आणि ती पूर्णही केली, असे केजरीवाल म्हणाले.