पूर्व लडाख क्षेत्रात चीनच्या हवाई दलाने क्षेपणास्त्रे आणि रडार यंत्रणा मोठय़ा प्रमाणावर तैनात केली आहे, मात्र भारताने कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत, असे हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने आणि हवाई सामथ्र्य यावर विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.

चीनच्या लष्कराच्या सहकार्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने मोठय़ा प्रमाणावर क्षेपणास्त्रे आणि रडार यंत्रणा तैनात केली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रेही तैनात करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

भारतानेही याचा मुकाबला करण्यासाठी तयारी केली आहे, लडाखमध्ये राफेल आणि मिग-२९ही सज्ज आहेत. चीनकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही दु:साहसाला उत्तर देण्यास भारत सज्ज आहे, असेही भदौरिया यांनी यावेळी सांगितले.